संगमनेर:
साकूर येथील शालेय विद्यार्थीनीच्या अत्याचार प्रकरणाचा तपास घारगाव पोलिस निरिक्षकांकडून काढून घ्यावा तसेच यापूर्वी अशीच घडलेली घटना मिटविणाऱ्या व्यक्तींना सहआरोपी करुन त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी आज मयत मुलीच्या नातेवाईकांनी पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
यासंदर्भात नातेवाईकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साकूर येथे आमच्या कुटूंबातील मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर तीने आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेमुळे साकूर आणि पंचक्रोशीत गावांमध्ये अद्यापही संवेदनशील वातावरण आहे. यापूर्वीही या भागामध्ये अशा घटना घडल्यानंतरही पोलिसांकडून कारवाई न झाल्यामुळे विद्यार्थीनी व पालकांमध्ये भितीचे वातवरण कायम राहिले आहे. मुलीच्या मृत्यूनंतर घारगाव पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून आमच्या कुटूंबियांना झालेला त्रास हा खूप गंभिर होता. त्यामुळे त्यांच्याकडून निर्णायक तपास होईल याबाबत आम्ही साशंक आहोत. त्यामुळेच त्यांच्याकडून हा तपास काढून घेण्यात यावा अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.
सदर घटनेत सहभागी असलेल्या आरोपींनी यापूर्वीही मुलीची छेडछाड करुन त्यांना त्रास दिल्याची घटना उघड झाली होती. मात्र गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी घटनेत हस्तक्षेप करुन पोलिसांपर्यंत ते प्रकरणं जावू न देता हे प्रकरण परस्पर मिटविण्याचा प्रयत्न केल्यामुळेच या आरोपींना पुन्हा असे कृत्य करण्याचे धाडस झाले. यापूर्वीच त्यांच्यावर कारवाई झाली असती तर नंतरची घटना ही घडली नसती. ही वस्तुस्थिती महिलांनी पोलिस उपअधिक्षक वाकचौरे यांच्या निदर्शनास आणून दिली.
आपल्या ताब्यात असलेल्या आरोपींकडून पहिल्याही घटनेतील माहिती समोर येवू शकेल आणि आरोपींना पाठबळ देण्याऱ्या व्यक्तींचीही नावे समोर आल्यास त्यांच्यावरही कारवाई व्हावी अशी पंचक्रोशीतील महिलांसह आमच्या कुटूंबीयांची मागणी आहे. त्यामुळेच संबंधित आरोपींचा यापूर्वीच्या घटनेत असलेला सहभाग आणि अन्य व्यक्तींनी त्यांना असलेली साथ याची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेले आहे.
दरम्यान याच गंभिर घटनेच्या पार्श्वभूमीवर पठार भागातील सामाजिक कार्यकर्त्या पुजा रविंद्र सोनवणे यांनीही महिलांसह येवून पोलिस उपअधिक्षकांना याबाबत निवेदन दिले असून, त्यांनी साकूर येथे सातत्याने घडलेल्या घटनांबाबत गांभिर्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे.