महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा 37 वा पदवीप्रदान समारंभ संपन्न
कृषि क्षेत्रासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राधाकृष्ण विखे पाटील यांना महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभामध्ये डॉक्टर ऑफ सायन्स प्रदान
सन 2047 चा विकसीत भारत घडविण्याचे स्वप्न कृषि विद्यापीठांच्या प्रयत्नांतून पूर्ण होणार -राज्यपाल श्री. रमेश बैस
राहुरी(प्रतिनिधी श्रीकांत जाधव):
कृषि हा आपल्या देशाचा मुख्य आधार असुन 58 टक्के पेक्षा जास्त लोक कृषिक्षेत्राशी निगडीत आहेत. या कृषिक्षेत्राच्या भविष्याला आकार देण्यासाठी कृषि विद्यापीठांची भूमिका महत्वाची असणार आहे. तुम्ही कृषि विद्यापीठातून केवळ पदवी घेतलेले पदवीधर विद्यार्थी नसुन तुम्ही नवपरिवर्तनाचे अग्रदुत आहात. महाराष्ट्राला कृषिची समृध्द अशी परंपरा लाभलेली असून ही परंपरा सर्मपक भावनेने जपण्यासाठी तुम्हाला संधी मिळालेली आहे. ज्या शेतकर्यांचे जीवन पुर्णपणे शेतीवर अवलंबून आहे अशा लोकांचे जीवन समृध्द बनविण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करा. सन 2047 चा विकसीत भारत घडविण्याचे स्वप्न कृषि विद्यापीठे व या विद्यापीठातून पदवी घेतलेले तुम्ही कृषिचे पदवीधर आपल्या ज्ञान व कौशल्यानेच साकार कराल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलपती श्री. रमेश बैस यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या 37 व्या पदवीप्रदान समारंभात स्नातकांना उदद्ेशून अध्यक्षस्थानावरुन राज्यपाल रमेश बैस हे ऑनलाईन मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन ट्रस्ट फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ अॅग्रीकल्चरल सायन्सेस (टास) चे अध्यक्ष, भारत सरकारच्या कृषि संशोधन व शिक्षण विभागाचे माजी सचिव तथा नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक पद्मभूषण डॉ. आर.एस. परोदा उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, महिको कंपनीचे अध्यक्ष श्री. राजेंद्र बारवाले, नाशिक येथील सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, परभणी कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणी, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, दापोली येथील डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषचेदे महासंचालक श्री. रावसाहेब भागडे, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉ. प्रदिप इंगोले, अधिष्ठाता (कृषि) डॉ. श्रीमंत रणपिसे, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, नियंत्रक श्री. सदाशीव पाटील, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलिप पवार आणि विद्या शाखेचे उपकुलसचिव श्रीमती स्वाती निकम उपस्थित होते.
सन्माननीय राज्यपाल तथा कृषि विद्यापीठाचे कुलपती श्री. रमेश बैस यांच्या वतीने कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांच्या शुभहस्ते नामदार राधाकृष्ण विखे पाटील, राजेंद्र बारवाले व श्री. विलास शिंदे यांनी कृषि क्षेत्रासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानीत केले. यावेळी कुलगुरु डॉ. पाटील यांनी मानपत्रांचे वाचन केले. तसेच यावेळी 73 विद्यार्थ्यांना पीएच. डी., 300 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी व 6,522 विद्यार्थ्यांना पदवी असे एकुण 6,895 पदव्या प्रदान करण्यात आल्या.
या कार्यक्रमप्रसंगी कृषिदर्शनी-2024, पौष्टिक तृणधान्य माहिती पुस्तीका, मफुकृवि आयडॉल्स व मफुकृवि दिनदर्शिका प्रकाशनांचे मान्यवरांच्या शुभहस्ते विमोचन करण्यात आले. समारंभाला अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी कुलगुरु डॉ. योगेंद्र नेरकर, डॉ. सुभाष पुरी, डॉ. राजाराम देशमुख, डॉ. तुकाराम मोरे, डॉ. के.पी. विश्वनाथा, डॉ. एम.सी. वार्ष्णेय, डॉ. शंकरराव मगर, डॉ. अशोक ढवण, डॉ. किसनराव लवांडे, डॉ. संजय सावंत, डॉ. विलास भाले, माजी आ.श्री. चंद्रशेखर कदम, माजी संचालक डॉ. किरण कोकाटे, डॉ. हरी मोरे, विद्या परिषद सदस्य, मान्यवर, पत्रकार, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, अधिकारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी, विद्यार्थीनी व प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई व डॉ. भगवान देशमुख यांनी केले.

