सत्ताधारी लोकप्रतिनिधी इलेक्शन मोडमध्ये, जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेकडेच्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्षः अभिषेक कळमकर
नगर:
नगर जिल्ह्यात मागील काही काळात कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. मागील आठवड्यात राहुरीतील आढावया वकील दाम्पत्याचं अपहरण करून खून करण्यात आला. न्यायिक प्रक्रियेचा महत्वाचा घटक असलेले वकीलही आता सुरक्षित राहिले नाहीत. सराईत आरोपींनी या वकील दाम्पत्याचा थंड डोक्याने खंडणीसाठी खून केला. पोलिसांनी घटनेनंतर जलद तपास करून आरोपी जेरबंद केले. मात्र या घटनेचे वकील वर्गात तीव्र पडसाद उमटले आहेत. न्यायालयीन कामकाजावरही परिणाम झाला आहे. ही घटना फक्त वकील वर्गापुरती मर्यादित नसून नगर जिल्ह्यात पोलिस दलाची कार्यपद्धती, गुन्हेगारांना वेसण घालण्यात येत असलेले अपयश अशा अनेक गोष्टींचा उहापोह होणं गरजेचे आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष, माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी आज पत्रकार परिषदेत मांडली.
जिल्ह्याची जबाबदारी असलेले गृहमंत्री फडणवीस काय करताहेत??
-कळमकर म्हणाले, शासकीय यंत्रणा, पोलिसांवर धाक असणं त्यांना कर्तव्य पार पाडण्यासाठी शासनाचा, लोकप्रतिनिधींचा दबाव असणं आवश्यक आहे. आपल्या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः वकील आहेत. त्यांच्या पक्षाच्या रचनेत ते अहमदनगर जिल्ह्याची धुरा सांभाळतत अशीही माहिती आहे. पण नगर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था, ताबेमारीचे गुन्हे, खून, दरोडे अशा घटनांची त्यांनी कधीही गांभीर्याने दखल घेतली असे दिसले नाही.
जिल्ह्यातील सत्ताधारी इलेक्शन मोड मध्ये व्यस्त!!
-सत्ताधारी तीन पक्षांचे स्थानिक लोकप्रतिनिधी तर सध्या निवडणुकीच्या इव्हेंट मध्ये मग्न आहेत. एकही सत्ताधारी लोकप्रतिनिधी पोलिसांच्या कार्यपद्धती सुधारावी यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख उंचावतचआहे.
शहराच्या लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष की हतबलता!!
-नगर शहरातही खून, चोऱ्या, दरोडे, ताबेमारीचे प्रकार वाढत आहेत. त्यावर पोलिसांचा अंकुश राहिलेला नाही. शहरातील व्यापारी दहशतीत आहे. मध्यंतरी स्थानिक लोकप्रतिनिधींना या प्रश्नावर उपोषणाचा इशारा द्यावा लागला. यावरून लोकप्रतिनिधी किती हतबल झाले किंवा ते राजकारणातच किती मग्न आहेत हे समोर येते. सध्या आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी गावात गावात जाऊन आश्वासनांची खैरात दिली जाते आहे. यात कायदा सुव्यवस्था राखून नगरकरांना दहशत मुक्त सुरक्षित जीवनाची हमी देण्याचा विसर सगळ्यांनाच पडत आहे, असा आरोप कळमकर यांनी केला आहे.
जिल्ह्याला हवा खमक्या वरिष्ठ अधिकारी..
– नगर शहरासह एकूण जिल्ह्यात वाढलेली गंभीर स्वरूपाची गुन्हेगारी याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करत कळमकर यांनी एकेकाळी नगर जिल्ह्याला विश्वास नांगरे पाटील, कृष्णप्रकाश यां सारखे खमके जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यरत होते. त्यांनी आपल्या दराऱ्यातून संपूर्ण जिल्ह्यातील गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात अंकुश ठेवला होता याची आठवण कळमकर यांनी करून देत सध्याच्या परस्थिती कडे लक्ष वेधले.