मुंबई:
आज मुंबई येथे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षेखाली व उद्योगमंत्री उदय सांमत यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक संपन्न झाली.
यावेळी जिल्ह्यातील बेलवंडी ता. श्रीगोंदा येथील शेती महामंडळाच्या 618 एकर जमिनीवर एमआयडीसी उभारण्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.
सदर एमआयडीसीच्या आराखड्यासंदर्भात पाहणी व सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून त्या संबंधित सर्व कामे काल मर्यादेत करण्यात यावीत असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी अधिकारांना दिले.
एमआयडीसी सुरू करण्यासंदर्भात मोजणीचा अहवाल मागविण्यात आला आहे. पुढील प्रकियेस गती देण्यात येणार असून, तात्काळ हे काम पुर्ण करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच, जिल्हाधिकारी यांनी आजच उद्योग विभागाकडे विनंती प्रस्ताव सादर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्रीगोंदा तालूक्यातील बेलवंडी फार्म येथे शेती महामंडळाची मौजे पर्वतवाडी आणि महादेववाडी येथील 618 एकर जमीन उद्योग विभागला देण्याची तत्वत: मान्यता यावेळी देण्यात आली. या एमआयडीसी करिता खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी पाठपुरावा केला होता. उद्योगनगरीसाठी जमीन दिल्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योगमंत्री उदय सांमत यांचे आभार व्यक्त केले.
खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले की बेलवंडी मध्ये रस्ते वाहतूक, पाणी तसेच रेल्वे वाहतुक सुविधा उपलब्ध तर आहेच शिवाय शिर्डी, पुणे आणि नाशिक एमआयडीसी केंद्र नजीक असल्याने येणाऱ्या काळात बेलवंडी उद्योजकांना मोठी पर्वणीच ठरणार आहे. या एमआयडीसी मुळे जिल्ह्यात उद्योगाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, श्रीरामपूर तालुका व राहता तालुक्यातील शेती महामंडळाकडे असलेल्या जमिनीच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. खंडकरी शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनींचा भोगवटादार वर्ग / मधुन भोगवटादार वर्ग १ करणे तसेच सार्वजनिक प्रयोजनार्थ शेती महामंडळाची जमीन वाटप करणे संदर्भातील कामांचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी घेतला.
सदर बैठकीत खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते, महसूल विभागाचे अप्पर सचिव राजगोपाल देवरा, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विश्वजित माने यांच्यासह महसूल आणि शेती महामंडळ पुणे यांचे अधिकारी उपस्थित होते.
चर्चेतल्या कर्जत एमआयडीसीचे काय!! :कर्जत-जामखेड तालुक्यातील बेरोजगार युवकांच्या साठी राष्ट्रवादीचे आ.रोहित पवार यांनी कर्जत तालुक्यातील पाटेगाव-खंडाळा इथे प्रस्तावित केली होती. या एमआयडीसी बाबत अनेक शासकीय पूर्तता करत केवळ अधुसूचना निघणे बाकी होते. दरम्यान राज्यात सत्ताबदल झाला. या नंतर या विषयात भाजप आ.राम शिंदे यांनी प्रस्तावित एमआयडीसी बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. आ.रोहित-पवार आणि आ.राम शिंदे यांच्या वादात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप-प्रत्यारोप झाले. अखेर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सदर एमआयडीसीचा प्रस्तावच रद्द करत नव्याने प्रस्ताव सादर करावा असा निर्णय घेतला. एकूणच राजकीय वादात “चर्चेत” राहिलेली एमआयडीसी असून कागदावरच असताना दुसरीकडे आता मंत्री राधाकृष्ण विखे आणि खा.सुजय विखे यांच्या प्रयत्नातून आ.बबनराव पाचपुते यांना सोबत घेत श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी इथे तब्बल 618 एकरात उद्योग नगरीच्या प्रस्तावाला मंजुरी घेण्यात आली आहे. तसेच पुढील तांत्रिक कार्यवाही साठी पाठपुराव्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकूणच कर्जत येथील एमआयडीसी चर्चेत राहिलेली असताना विखेंनी बेळवंडीत उद्योग नगरीचा प्रस्ताव पास करून घेण्यात यश मिळवले आहे. विखे पिता-पुत्रांचा हा “मास्टर स्ट्रोक” दुहेरी असल्याचे मानण्यात येते आहे.

