सरकारमधील नेत्यांत मुख्यमंत्री होण्यासाठी स्पर्धा वाढल्याने सरकारचे राज्याकडे दुर्लक्ष
राज्यातील वाढत्या राजकीय गुन्हेगारीवर बाळासाहेब थोरातांनी साधला शिंदे, फडणवीस, अजित पवारांवर निशाणा..
अहमदनगर:
सरकार मधली परिस्थिती पाहता गृहमंत्री असलेले उपमुख्यमंत्री अगोदर मुख्यमंत्री होते, दुसरे एक उपमुख्यमंत्री त्यांनाही मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा आहे. एकूणच या सरकारमधील अनेकांना मुख्यमंत्री होण्यासाठीची स्पर्धा दिसून येत आहे, या सगळ्या परिस्थितीत राज्यात गुंडगिरी वाढली असून त्याचा परिणाम दिसून येत आहे. सरकारमध्ये सर्व महत्वकांक्षी नेते पदावर आले असून त्यांचातच मेळ बसत नसल्याने त्यांचा प्रशासनावर आणि पोलिसांवर धाक राहिलेला नाही. यातून राज्यातील हत्या,खून, दहशत आदी प्रकार पूढे येत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे जेष्ठनेते आ.बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. ते नगर मध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी आ.लहू कानडे, जिल्हाध्यक्ष वाघ, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, संजय झिंजे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना थोरात पुढे म्हणाले की,
राज्यातली गुंडगिरीने इतका कळस केला आहे की अक्षरशः थंड डोक्याने मीडियासमोर लाईव्ह सुरू असताना घोसाळकर नावाच्या माजी नगरसेवकावर एक गुंड गोळ्या घालून हत्या करतो. एक भाजपचा आमदार आपल्याच सहकारी पक्षाच्या कार्यकर्त्यावर थेट पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतोय. राज्यकर्ते आणि त्यांचे सहकारीच गुन्हेगार म्हणून समोर येताना दिसत असल्याचे चित्र राज्यासाठी धोकादायक आहे. गुंडांमध्ये सरकार आपलेच आहे त्यामुळे अशी भावना झाली असून त्यावर पोलिसांची कसलीही जरब दिसून येत नाही. एकूणच राज्यातील कायदा-सुव्यवस्था परस्थितीवर सरकारचे नियंत्रण दिसून येत नसून सर्वसामान्य जनता घाबरलेली आणि दहशतीखाली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे जेष्ठनेते आ.बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
सध्या केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कारवाया सुरू असून यामध्ये ज्या कारवाया होत आहेत त्या राजकीय होत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी बाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाचा हवाला थोरात यांनी यावेळी दिला. केंद्रीय संस्था या सत्ताधाऱ्यांच्या गुलाम झाल्या आहेत. लोकशाही सध्या धोक्यात आली असल्याचे चंदीगड महापौर निवडणूक प्रकरणात दिसून आलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावर ताशेरे ओढले आहेत. एकूणच जनता हवालदिन झालेली असून या परिस्थितीत आता जनतेलाच निर्णय घेऊन परिस्थिती बदलावी लागेल. लोक न्याय मागतात पण त्या त्यांना न्याय मिळणार नसेल तर जनतेचे न्यायालय हे आता महत्त्वाचे ठरणार असल्यास महत्त्वपूर्ण विधान थोरात यांनी यावेळी केले.
आंबेडकरां बाबत मतांतर असले तरी एकत्र येऊ!!:
.वंचित चे प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत येत आहेत, मात्र त्यांनी काँग्रेसवर काही टीकाही केली आहे, याबाबत थोरात यांनी बोलताना त्यांनी समान कार्यक्रम समोर मांडलेले आहे. यावर सध्या चर्चा सुरू असून आम्हा सर्वांना जनतेचे प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यांनी काही प्रस्ताव दिले, आमचेही काही मुद्दे आहेत त्यावर चर्चा होऊन समान कार्यक्रम अंतिम केला जाईल ठरवला जाईल. काही मत मतांतरे असले तरी भाजपचे तत्वज्ञान देशाचे हिताचे नाही त्यासाठी आम्हाला एकत्र येऊन राष्ट्रहित हेच उद्दिष्ट ठेवून निवडणुकीला सामोरे जायचे आहे असं विधान बाळासाहेब थोरात यांनी केले.
शिर्डी मतदारसंघावर दावा कायम:
-नगर जिल्ह्यात लोकसभेच्या शिर्डी आणि अहमदनगर या दोन जागा आहेत. यातील शिर्डी येथील जागेवर शिवसेनेने दावा केला असला तरी काँग्रेसही या मतदारसंघात प्रबळ असून आमच्याकडे उमेदवार प्रबळ असल्याचा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला. मात्र याबाबतचा निर्णय तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.